धाराशिव : शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत भाजपात अधिकृत प्रवेश केला. नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आणि अक्षय जोगदंड यांनी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, या दोन्ही नगरसेवकांनी पक्ष सोडण्यामागील कारण स्पष्ट करताना काँग्रेसमधील वाढती अंतर्गत गटबाजी, स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी यांचा उल्लेख केला.
“पक्षात काम करताना सातत्याने गटबाजीचा सामना करावा लागत होता. आमच्या कामाला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अखेर आम्ही हा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भाजपात प्रवेश केल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी या दोघांचे स्वागत करताना सांगितले की, “विकासाच्या राजकारणाला साथ देण्यासाठी अनेक जण भाजपात येत आहेत. धाराशिवमध्येही विकासाची गती वाढवण्यासाठी अशा सक्षम लोकप्रतिनिधींची गरज आहे.”
यावेळी, नगरसेवक अमित शिंदे, नगरसेवक , उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक अभिजीत पतंगे हे उपस्थित होते.











