धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गावात एका ३६ वर्षीय युवकाचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. डोक्यात दगड घालून तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून हा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मृत युवकाचे नाव कृष्णाथ उर्फ कृष्णा साठे (वय ३५) असे असून, तो मंगरूळ गावचा रहिवासी होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी पाहणी केली असता, आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह जवळपास ९० फूट फरफटत नेऊन ओढ्याच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाखाली फेकल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी रक्ताचे डाग, ओढल्याच्या खुणा आणि झटापटीचे चिन्ह आढळून आल्याने खून अत्यंत नियोजनपूर्वक व निर्दयीपणे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधांच्या संशयातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी मृताच्या पत्नीसह एकूण सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू असून, खुनामागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मंगरूळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलीस प्रशासनाने गावात बंदोबस्त वाढवला असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.











