धाराशिव :सत्तेच्या नशेत चूर होऊन मल्हार पाटील यांनी केलेले वक्तव्य लोकशाही मूल्यांना धरून नसल्याची टीका शिवसेना (उबाठा) चे नेते जगदीश पाटील यांनी केली आहे. “पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथे राज्य करणार” असे वक्तव्य करून त्यांनी लोकशाहीचा अवमान केला असल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला.
मल्हार पाटील यांचे एकमेव कर्तृत्व म्हणजे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र असणे असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस योगदान त्यांनी दिलेले नाही, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. गेल्या चाळीस वर्षांत जिल्ह्याची सत्ता एका कुटुंबाभोवती केंद्रित राहिल्यामुळे धाराशिव जिल्हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मागास जिल्हा ठरल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आमच्या नेत्यांनी जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारत पराभव पचवला; मात्र विरोधकांना विजय पचवता आला नाही, म्हणूनच अशी अहंकारी भाषा केली जात असल्याचे जगदीश पाटील यांनी म्हटले आहे. “हा माज कसा उतरवायचा, हे जनतेला चांगलेच माहीत आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
धाराशिव जिल्ह्यात पुरोगामी, निर्व्यसनी आणि विकासाभिमुख राजकारणाची दिशा कायम ठेवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे मजबूत संघटन उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही उद्देशून बोलताना जगदीश पाटील म्हणाले की, “सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्यांनी आपल्या मुलाला अशी भाषा शिकवणे दुर्दैवी आहे. त्यांनी वेळीच त्याला आवर घालावा.”
शेवटी, “जनता जागरूक आहे. धाराशिवच्या मातीतील पैलवान तयार आहेत,” असे सांगत जगदीश पाटील yana इशारा दिला.











