धाराशिव : अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर तुळजापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाचे अवशेष धड आणि मुंडके रहस्यमयरीत्या गायब झाल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
माहितीनुसार, अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच मृतदेहाचे अवयव गायब झाल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले, तरी स्थानिकांमध्ये जादूटोणा किंवा काळ्या जादूचा संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, हा एकच प्रकार नसून गेल्या १५ दिवसांत स्मशानभूमीतून जळालेल्या प्रेताची राख आणि काही अवयव गायब होण्याच्या घटना आधीही घडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून, हा एखाद्या संघटित प्रकाराचा भाग तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
घटनेनंतर संबंधित मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. मात्र, अद्याप ठोस तपास सुरू न झाल्याने आणि पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, ज्यांच्या नातेवाईकांचे अवशेष गायब झाले आहेत, त्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून त्यांनी तातडीने सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. “असा प्रकार पुन्हा होऊ नये, दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्मशानभूमीची सुरक्षा, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











