धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल सुरू असून लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेल्या अर्चना पाटील यांनी केशेगाव आणि तेर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने अर्चना पाटील या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीत जर भाजपची सत्ता आली तर अध्यक्षपदाची सूत्रे अर्चना पाटील यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पराभवाची भीती असल्याने अर्चना पाटील यांनी दोन गटातून निवडणूक उमेदवारी दाखल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी केला होता सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त मताने पराभव
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून तब्बल सव्वातीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
या पराभवानंतर आता अर्चना पाटील पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून यावेळी त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.











