धाराशिव – पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आज धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारत लोकशाहीला काळीमा फासल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पत्रकारांना दारातच रोखण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले. या निर्णयाचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “जर काही लपवायचे नव्हते, तर पत्रकारांना प्रवेश का नाकारला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
मात्र, सभागृहात या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांनी मौन बाळगल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “तुतारी आणि कमळ एकाच तालावर?” अशी कुजबुज सभागृहाबाहेर रंगली. सभा संपल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप केले. “लोकशाहीत चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांना बाहेर ठेवणे म्हणजे पारदर्शकतेची भीती,” असे म्हणत त्यांनी सभेत नेमके काय घडले याचा संपूर्ण पाडा पत्रकारांसमोर वाचून दाखवला.
विरोधकांच्या मते, सभेत अनेक संवेदनशील विषयांवर चर्चा झाली. मात्र, त्या चर्चेची माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणूनच पत्रकारांना रोखण्यात आले. “जनतेच्या पैशांचा हिशोब देताना घाबरायचे कारण काय?” असा सवाल करत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यात आली.धाराशिवच्या राजकारणात या घटनेमुळे नवे वादळ उठण्याची चिन्हे आहेत. पत्रकारांना प्रवेश नाकारण्यामागील नेमके कारण काय, याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांकडून अद्याप देण्यात आलेले नाही. दरम्यान, या निर्णयाविरोधात पुढील आंदोलनाचा इशारा विरोधकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, सभागृहात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यासारख्या गंभीर विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पूर्णपणे गप्प बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही ठोस भूमिका त्यांनी मांडली नाही. त्यामुळे “तुतारी आणि कमळ एकीच आहे का?” असा सवाल राजकीय वर्तुळात जोर धरू लागला आहे.
भारतीय जनता पक्षच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा देत तुतारीवाल्यांनी मौन धारण केल्याचा आरोप विरोधकांनी केला. “लोकशाहीवर घाला घातला जात असताना गप्प राहणे म्हणजे मूकसंमतीच,” असा घणाघाती आरोप करत विरोधकांनी तुतारीवाल्यांनाही लक्ष्य केले.
“पत्रकारांना बाहेर ठेवून सभागृहात काय शिजत होते, याची भीती कोणाला आहे? आणि जर पारदर्शकता असती, तर तुतारीवाल्यांनी आवाज का उठवला नाही?” असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी ‘तुतारी- कमळ मैत्री’वर थेट निशाणा साधला.











