धाराशिव | राज्याचे लक्ष लागून असलेल्या तेर जिल्हा परिषद गटात निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगला असून, येथे “दुरंगी लढतीचे” स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे तेरमधील प्रभावी नेतृत्व मुन्ना खटावकर यांच्या पत्नी कीर्तीमाला खटावकर यांच्यात थेट सामना होत असल्याने प्रचाराचा ताप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
जिल्हा परिषद निवडणुकीचा आखाडा जसजसा पेटत चालला आहे, तसतशी ही लढत अधिकच तीव्र होत आहे. अर्चना पाटील या पद्मसिंह पाटील यांच्या सून तसेच भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद व प्रशासनाचा तगडा अनुभव आहेच, शिवाय मजबूत राजकीय व कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने या निवडणुकीतील त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
दुसरीकडे, कीर्तीमाला खटावकर यांचे पती मुन्ना खटावकर हे तेरमध्ये सामान्य कुटुंबातील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू मानले जात असून त्यांच्या पाठीशी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ताकद उभी आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी कीर्तीमाला खटावकर यांना उमेदवारी देत थेट रणांगणात उतरवले आहे.
जरी समोरासमोरचा सामना कीर्तीमाला खटावकर विरुद्ध अर्चना पाटील असा दिसत असला, तरी राजकीय जाणकारांच्या मते खरी लढत ही भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गट व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातच आहे.
आता या तेर गटातील दुरंगी लढतीत नेमकी बाजी कोण मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे.











