धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत Dharashiv 2.0 या इंस्टाग्राम पेजने सरळसरळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी बोगस एक्झिट पोल टाकला—असा आरोपशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. मात्र, असं असतानाही प्रशासनाने घेतलेली संशयास्पद शांतता आणि कारवाईतील उठाठेव यावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाचे दुटप्पी धोरण असल्याचे उघड केले आहे.
Dharashiv 2.0 चा बोगस पोल, मतदारांमध्ये संभ्रम — तरीही प्रशासन शांत!
निवडणूक काळात Dharashiv 2.0 या पेजवर टाकण्यात आलेला एक्झिट पोल पूर्णपणे खोटा, भ्रामक आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रचनाबद्ध रितीने पसरवलेला होता. हा प्रकार थेट आचारसंहितेचा भंग असूनही संबंधित पेजवर एकही तातडीची कारवाई न होणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उठवणारे आहे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काही तासात शहरभर त्याची चर्चा सुरु झाली. विरोधकांकडूनही हा प्रयत्न “सार्वजनिक मतप्रवाह वळवण्यासाठीचा घोर कट” असा म्हटला जात आहे.
सूर्यवंशींची तातडीची तक्रार — जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले पुढे… पण पुढे कायच झालं नाही!
या प्रकारावर तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना लेखी तक्रार देऊन Dharashiv 2.0 पेजवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवले. पण तिथून पुढे फाईल केवळ थंडगार खोलीत धूळ खात पडून राहिली. आचारसंहिता कक्ष प्रमुख नलावडे यांच्याकडे पत्र दिलं—पण तीन-चार दिवस त्यावर एकही उत्तर नाही, एकही प्रतिसाद नाही, कारवाईचा एकही ठोका नाही.
“असा मौन म्हणजे थेट संरक्षण!” सूर्यवंशींचा प्रशासनावर हल्ला
सततची टोलवाटोलवी होत असल्याने सूर्यवंशी यांनी थेट निवडणूक आयोगालाच मेलद्वारे तक्रार पाठवली.
आणि आश्चर्य म्हणजे निवडणूक आयोगाने तात्काळ प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना ‘स्वयंस्पष्ट अहवाल सादर करा’ असे आदेश दिले! म्हणजे प्रश्न असा की, निवडणूक आयोगाला तात्काळ कारवाई दिसते, पण स्थानिक प्रशासनाच्या नजरेत हा गंभीर गुन्हा का दिसत नाही?











