धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील दोन ज्येष्ठ दाम्पत्ये पर्यटनासाठी दुबई येथे गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडली आहेत. जवळील आर्थिक साधने संपत आल्याने राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली असून केंद्र सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करून सुरक्षितपणे भारतात परत आणावे, अशी विनंती संबंधित कुटुंबीयांनी केली आहे.
उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. नियोजनानुसार ते १ मार्च रोजी भारतात परतणार होते. मात्र, अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबईहून होणारी विमानसेवा रद्द करण्यात आल्याने ते तेथेच अडकले आहेत.
परदेशात अडकलेल्या या ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती व वाढते खर्च लक्षात घेता केंद्र सरकारने तातडीने विशेष विमानसेवा सुरू करून त्यांना मायदेशी परत आणावे, अशी मागणी दळगडे व माशाळकर कुटुंबीयांनी केली आहे.
या घटनेमुळे उमरगा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.











