धाराशिव — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “सत्ता ही अंतिम ध्येय नसते; पक्षाची एकजूट आणि विचारसरणी याहून मोठी असते. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढील सत्तास्थापनेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला.
“स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून जाणीवपूर्वक पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही तथाकथित स्वयंघोषित नेते माध्यमांमधून खोटा नैरेटिव्ह तयार करत आहेत. हे कदापि सहन केले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मात्र हा केवळ राजकीय डाव आहे. आमच्यात कोणताही मतभेद नाही,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. “आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना किंवा दबावाला आम्ही बळी पडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुढील रणनीतीबाबतही संकेत दिले.
“या अधिवेशनादरम्यान मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनिता ताई पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती निश्चित करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरनाईक यांनी तथाकथित बोलघेवड्या स्वयंभू नेत्यांना थेट इशारा देत सांगितले की, “पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय कोणीही पुढील रणनीतीबाबत भाष्य करू नये. पक्षशिस्त सर्वांसाठी समान आहे. अनुशासन भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
“सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड करणार नाही. दबाव, आमिष, अफवा किंवा राजकीय प्रलोभनांच्या आधारावर शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिवसैनिकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, संघटन अधिक बळकट करावे आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करत सरनाईक यांनी आगामी काळात शिवसेना अधिक संघटित, सक्षम आणि प्रभावीपणे उभी राहील, असा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आले असून, सत्तास्थापनेबाबतचे पुढील निर्णय आणि संभाव्य राजकीय घडामोडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










